संगमनेर:
संगमनेर तालुक्यातील कासारा-दुमाला येथील रहिवासी स्वप्नील रोहिदास सातपुते आणि त्यांचे सासरे त्र्यंबक लक्ष्मण राऊत यांना मालपाणी बजाज शोरूममध्ये झालेल्या बेदम मारहाणीच्या निषेधार्थ शुक्रवारी संगमनेर येथील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनावर ग्रामस्थांच्या वतीने एक भव्य मोर्चा काढण्यात आला.
३० मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
शोरूममध्ये नादुरुस्त वाहनाची पावती मागण्यावरून झालेल्या वादात व्यवस्थापक सचिन पलोड व कर्मचाऱ्यांनी इतरांना बोलावून ही मारहाण केल्याचा आरोप आहे. आंदोलकांनी हाताला काळ्या फिती बांधून आणि आरोपींचे फोटो असलेले फलक हाती घेऊन शोरूम व्यवस्थापन व पोलिसांच्या संथ कारभाराचा निषेध केला, तसेच प्रशासकीय भवनाच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले.
आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास तीव्र उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन शहर पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी स्वतः आंदोलनस्थळी येत मागण्यांचे निवेदन स्वीकारले आणि योग्य त्या कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले.
