संगमनेर:
अधिकमासाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या आठव्या पर्वाची पंचक्रोशीत मोठी चर्चा रंगली असून, या भव्य सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सप्ताह समितीच्या वतीने करण्यात येत असलेल्या गावभेटी आणि अहोरात्र परिश्रमांमुळे या सोहळ्याचे वारे संपूर्ण तालुक्यात वाहू लागले आहेत. भक्ती, अध्यात्म, संस्कार, कृषी, ज्ञान आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगम घडवून आणणाऱ्या या सप्ताहाबद्दल भाविकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
विश्वगौरव विभूषित महायोगी प.पू. गगनगिरी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही परंपरा यंदा ८ ते १५ जून या कालावधीत राजापूर रोड येथील जयवंतराव व बाळासाहेब गुंजाळ पाटील गुंजाळवाडी मळा येथे मोठ्या थाटात पार पडणार आहे. सप्ताह समिती, गगनगिरी महाराज भक्त परिवार आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांतून साकारत असलेल्या या सोहळ्याला तालुक्यातील हजारो भाविक हजेरी लावणार आहेत.
या सप्ताहादरम्यान भाविकांसाठी हरिनाम, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ आणि समाजप्रबोधनपर व्याख्यानांची मोठी मेजवानी असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने महंत ह.भ.प. रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांची रसाळ वाणीतून होणारी श्रीराम कथा दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत रंगणार आहे. तसेच यंदाच्या सप्ताहाचे मुख्य आकर्षण म्हणजे बुधवार, १० जून रोजी सकाळी ९ वाजता सनातन धर्माचे अध्वर्यू आद्य शंकराचार्यांच्या पादुका दर्शनाचा सुवर्णयोग भाविकांना लाभणार आहे.
समाजाला योग्य दिशा देण्यासाठी दररोज सकाळी ११ वाजता प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नंदकुमार पोवार, इंद्रजीत देशमुख, डॉ. संजय मालपाणी, भास्कर पेरे पाटील आणि शालिनीताई देशमुख-इंदुरीकर यांसारखे नामवंत वक्ते विचार मांडणार आहेत. त्यानंतर दररोज दुपारी ३ वाजता ह.भ.प. समाधान महाराज शर्मा, संजय महाराज पाचपोर, जयंत महाराज पाटील, विशाल महाराज खोले, सोमनाथ महाराज सानप, उद्धव महाराज मंडलिक आणि निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकर यांच्या सुश्राव्य कीर्तनसेवेचा लाभ भाविकांना घेता येईल.
या आध्यात्मिक सोहळ्याला आधुनिकतेची जोड देण्यासाठी ‘गगन भरारी कृषी महोत्सवा’चे विशेष आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात १०५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून, ९ जून रोजी जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्र महाराज यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती, प्रगत तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकासाची अत्यंत महत्त्वाची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे.
सोहळ्यादरम्यान प.पू. गगनगिरी महाराजांच्या पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. संपूर्ण सप्ताहभरात स्वामी गोविंदगिरीजी महाराज, आत्मा मलिक माऊली परंपरेचे उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज (वेरूळ), विश्वचैतन्य सद्गुरू श्री नारायण महाराज, श्री टेंबे स्वामी व सद्गुरू रामगिरीजी महाराज अशा थोर संतांच्या दर्शनाचा आणि सत्संगाचा लाभ परिसरातील जनतेला मिळणार आहे. या अभूतपूर्व सोहळ्याची सांगता रविवार, १५ जून रोजी सकाळी १० वाजता ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि त्यानंतर होणाऱ्या भव्य महाप्रसादाने होणार आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी समितीचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि भक्तगण अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
