संगमनेर:
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील वीज उपकेंद्रावरील ट्रान्सफॉर्मरची क्षमता आमदार अमोल खताळ यांच्या विशेष पाठपुराव्यातून दुप्पट करण्यात आली असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून या उपकेंद्रावर अतिरिक्त भार येत असल्याने शेतकऱ्यांना कमी दाबाने आणि अपुऱ्या प्रमाणात वीजपुरवठा होत होता, याचा थेट परिणाम शेतीपिकांच्या सिंचनावर होत होता. ही समस्या लक्षात घेऊन आमदार खताळ यांनी महावितरण प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि ५ एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर आता १० एमव्हीए करण्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला.
या ट्रान्सफॉर्मरचे काम आता पूर्णत्वास आले असून लवकरच त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. या निर्णयामुळे धांदरफळसह परिसरातील गावांना अधिक स्थिर आणि पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध होणार असल्याने शेतीपंप चालवणे सोपे होणार आहे.
अनेक दिवसांची ही महत्त्वाची समस्या सुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहेत.


