महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी करताना तांत्रिक अडचणी किंवा माहितीअभावी ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत, त्यांना पुन्हा एकदा दुरुस्तीची संधी द्यावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना सविस्तर निवेदन दिले आहे.
आमदार खताळ यांनी निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर मतदारसंघासह राज्यातील अनेक महिलांनी ई-केवायसी करताना अज्ञानामुळे ‘घरामध्ये शासकीय कर्मचारी आहे’ हा पर्याय चुकून निवडला आहे. प्रत्यक्षात कुटुंबात कोणताही शासकीय कर्मचारी नसताना केवळ या एका चुकीमुळे त्यांना ‘अपात्र’ ठरवून नाकारले जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, पात्र असूनही हजारो महिला केवळ माहितीअभावी या महत्त्वाकांक्षी योजनेपासून वंचित राहत आहेत.

या समस्येवर तोडगा म्हणून, ज्या महिलांनी चुकून ‘शासकीय कर्मचारी’ पर्याय निवडला आहे त्यांना पुन्हा ई-केवायसी करण्याची विशेष संधी देण्यात यावी आणि ज्यांची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे त्यांना आवश्यक मुदतवाढ द्यावी, अशी विनंती खताळ यांनी केली आहे. तसेच तांत्रिक कारणांमुळे थांबलेले आर्थिक सहाय्य तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. केवळ तांत्रिक त्रुटी किंवा मानवी चुकांमुळे कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहू नये, अशी भूमिका मांडत आमदार अमोल खताळ यांनी यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
