संगमनेर:
जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि गौण खनिजाचे विनापरवाना उत्खनन करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर केवळ दंड न आकारता त्यांच्यावर ‘मोक्का’ किंवा ‘एमपीडीए’ सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.
संगमनेर तालुका दौऱ्यादरम्यान आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी वाळू तस्करांच्या टोळ्या मोडीत काढण्यासाठी पोलीस आणि महसूल विभागाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी या दौऱ्यात केवळ प्रशासकीय कामांचा आढावा घेतला नाही, तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरून शेतकऱ्यांशी संवाद साधला. साकुर व खंडेरायवाडी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी रब्बी पिकांची ‘ई-पीक’ पाहणी केली आणि ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेचे काम मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश दिले.
यासोबतच साकुर येथील घनकचरा व्यवस्थापन, मियावाकी वन प्रकल्प आणि कासारा दुमाला येथील महिला बचत गटाच्या दुग्ध प्रक्रिया केंद्राला भेट देऊन त्यांनी कामकाजाचे कौतुक केले. निमोण येथील सौरऊर्जा प्रकल्प आणि संगमनेरमधील ट्रक टर्मिनल व एमआयडीसीतील उद्योजकांच्या समस्यांबाबतही त्यांनी सकारात्मक चर्चा करत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
