संगमनेर – प्रतिनिधी
आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सच्चा शिवसैनिकांचा सन्मान करत उमेदवारी दिली जाईल आणि विरोधकांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद दाखवून दिली जाईल, असे प्रतिपादन शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवनियुक्त जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी केले. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी असली तरी, आघाडी न झाल्यास सर्वत्र पूर्ण ताकतीने उमेदवार दिले जातील आणि त्यांच्या विजयासाठी पराकाष्टा केली जाईल, असेही ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उत्तर नगर जिल्ह्याचे मावळते जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना पदावरून हटवून सचिन कोते आणि जगदीश चौधरी यांची उत्तर नगर जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. नवनियुक्त दोन्ही जिल्हाप्रमुखांनी मंगळवारी संध्याकाळी संगमनेरला भेट देऊन येथील कार्याचा आणि निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला. यावेळी माजी शहर प्रमुख अमर कतारी यांच्या पुढाकारातून या दोन्ही जिल्हाप्रमुखांचा सत्कार करण्यात आला. जुन्या कार्यकारिणीतील बदलांमुळे जुनी मरगळ झटकून ठाकरेंचे शिवसैनिक आता रणांगणात उतरल्याचे चित्र आहे.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत उत्तरेमध्ये झालेल्या संघटनात्मक बदलांचे स्वागत करण्यात आले. तसेच तालुक्यातील अनेक निष्ठावंत शिवसैनिक, युवा सैनिक व महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्हाप्रमुख जगदीश चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, “येत्या निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आले पाहिजेत यासाठी तयारीला लागा,” असे आवाहन केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका ठामपणे महायुतीच्या विरोधात राहणार असून, निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढवायची की स्वतंत्र याबाबतचा निर्णय पक्षीय पातळीवर होईल आणि त्या निर्णयाप्रमाणे सर्वांनी काम करावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी अमर कतारी म्हणाले की, ज्या-ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे, त्या-त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार व बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून शिवसैनिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
यावेळी श्रीरामपूर येथील अशोक थोरे, कोपरगाव येथील भरत मोरे यांनीही मार्गदर्शन केले. असलमभाई शेख, पैलवान गगन हाडा, शुभम वाघ आदी यावेळी उपस्थित होते.
युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, गोविंद नागरे, योगेश खेमनर, वैभव अभंग, अमोल डुकरे, सचिन साळवे, रवींद्र कानकाटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक दीपक साळुंके यांनी केले तर असिफ तांबोळी यांनी आभार मानले.
यावेळी महिला तालुकाप्रमुख शितल हासे, भाऊसाहेब हासे, पठार भाग तालुका प्रमुख संजय फड, ईम्तियाज शेख, रहीम बेग, अल्ताफ शेख, सदाशिव हासे, आश्वीचे प्रकाशराजे गायकवाड, रंगनाथ फटांगरे, पप्पू कानकाटे, मुस्लिम मावळा अजीज मोमीन, रिक्षा सेनेचे अशोक बडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय सातपुते, सचिन धनवटे, बाळासाहेब कवडे, प्रभाकर गेठे, प्रशांत खजुरे, प्रकाश चोथवे, अनिल खुळे, पूजा कतारी, सुनंदा कतारी, काजल राठोड, लक्ष्मी खिची, सुगरिता खिची, मनवा तडासम, मीनाक्षी मसराम, संगीता खजुरे, मनीषा खजुरे, साधना पवार, मोहिनी कतारी, गौरी राजगोड, गुड्डी पवार, दीपक वनम, महमूदभाई मुसाभाई, मोहसीन शेख व वैशाली वडतल्ले आदींची उपस्थिती होती.