संगमनेर:
कडक उन्हाळा आणि वाढती पाणीटंचाई लक्षात घेता, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला तातडीने पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी हा दिलासादायक निर्णय झाला असून निळवंडे धरणातून आता उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार आहे.
नियोजनानुसार, धरणाच्या उजव्या आणि उच्चस्तरीय कालव्यातूनआज १५ एप्रिलपासून पाण्याचा विसर्ग सुरू होणार असून, डाव्या कालव्याद्वारे २५ एप्रिलपासून पाणी सोडले जाणार आहे.
अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी आणि कोपरगाव या पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मांडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
उच्चस्तरीय कालव्यावरील शेतकऱ्यांच्या मागणीचाही यात सकारात्मक विचार करण्यात आला असून, यामुळे पाचही तालुक्यांतील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. जलसंपदा विभागाने या आवर्तनाचे संपूर्ण नियोजन पूर्ण केले असून ठरलेल्या वेळापत्रकानुसार लाभक्षेत्राला पाणी उपलब्ध होणार आहे.



