Fri. May 29th, 2026

संगमनेर, प्रतिनिधी:

स्वराज्य आणि धर्मरक्षणासाठी ज्या हालअपेष्टा व अमानुष यातना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी सहन केल्या आणि अखेर स्वतःचे बलिदान दिले, त्या बलिदानाचा इतिहास आजच्या तरुण पिढीने तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे प्रत्यक्ष जाऊन अनुभवावा, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.

स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि शिवशंभू विचार मंच, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जाणता राजा मैदानावर आयोजित ‘प्रतापगडपर्व’ या महानाट्याचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज रायबा मालुसरे, ज्येष्ठ विचारवंत व शिवचरित्रकार एस. झेड. देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या नीलम खताळ आदी उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन जतन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील महायुती सरकारने युनेस्कोच्या माध्यमातून घेतला आहे. पूर्वीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा इतिहास अनेकांनी चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला.

मात्र धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू धर्मरक्षक संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जनमानसात जागविण्याचे कार्य करत आहे. प्रतिष्ठानचे उपक्रम प्रेरणादायी असून, आपण आमदार नसतानाही या संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे होतो आणि आता आमदार म्हणूनही प्रतिष्ठानच्या प्रत्येक धर्मकार्यास संपूर्ण सहकार्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

एस. झेड. देशमुख म्हणाले की, धर्मवीर संभाजी महाराजांनी तब्बल ४० दिवस अमानुष छळ सहन करूनही धर्मत्याग नाकारला. त्यांच्या त्यागातून संपूर्ण महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण झाले. त्यामुळे हिंदू समाजाने इतिहासाबाबत उदासीन न राहता अधिक सजग होणे आवश्यक आहे.

रायबा मालुसरे यांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करून मालुसरे घराण्याचा इतिहास जपण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पर्श केलेली कवड्यांची माळ तानाजी मालुसरे यांच्या वीरमरणानंतर त्यांच्या कुटुंबीयांना दिली होती. ही ऐतिहासिक कवड्यांची माळ आजही मालुसरे परिवाराने जतन करून ठेवली असून ती दर्शनासाठी संगमनेर येथे आणण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आई जगदंबेची महाआरती करण्यात आली तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर कानडे यांनी केले तर प्रास्ताविक प्रसाद कानडे यांनी केले.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!