संगमनेर:
तिगाव येथील दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या महेश गोरखनाथ सानप (वय १८) आणि ओंकार गोरखनाथ सानप (वय १४) या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या एक वर्षापूर्वीच वडिलांचे छत्र हरपलेल्या या कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण संगमनेर तालुक्यात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपला मुंबई दौरा आटोपून थेट तिगाव गाठले. त्यांनी मृत मुलांच्या मातोश्री मनीषा सानप व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि या कठीण काळात संपूर्ण तालुका व ग्रामस्थ कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा धीर दिला. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बाळासाहेब थोरात यांनी पीडित सानप कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळवून देण्यासाठी घटनास्थळावरूनच महसूल आणि कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला. शासनाच्या नियमांनुसार या कुटुंबाला जास्तीत जास्त आणि तातडीने आर्थिक मदत सुपूर्द करण्याचे कडक निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या सांत्वन भेटीदरम्यान तिगावचे सरपंच ज्ञानेश्वर सानप यांच्यासह गावातील अनेक आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
