संगमनेर (प्रतिनिधी):
गुंजाळवाडी येथे आयोजित परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहातील रामकथेचा नुकताच अभूतपूर्व उत्साहात समारोप झाला. या नऊ दिवसीय धार्मिक सोहळ्यात तब्बल सात लाख भाविकांनी रामकथेचे श्रवण केले, तर सांगतेच्या दिवशी महाप्रसादासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.
रामायणाचार्य ढोक महाराज यांनी आपल्या रसाळ वाणीने रामायणातील युद्धकांड आणि रामराज्य स्थापनेचा प्रसंग श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर उभा केला. प्रभू रामांचा अयोध्येतील राज्याभिषेक म्हणजे धर्म, न्याय आणि लोककल्याणाचा विजय होता, असे सांगत ढोक महाराजांनी रामकथेची सांगता केली. वनवास संपवून परतलेल्या प्रभू रामांचे गुरु, माता आणि बंधूंसोबत झालेले मिलन ऐकताना उपस्थित हजारो भाविकांचे डोळे पाणावले होते.
या भव्य धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील आणि दूरवरून आलेल्या हजारो भाविकांसह माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार अमोल खताळ, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कथा समितीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे, उद्योजक आबासाहेब थोरात आणि पाटणकर परिवारासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली होती.
