संगमनेर:
आमदार अमोल खताळ यांच्याकडून शहरातील अवैध कत्तलखान्यांविरोधात आता निर्णायक युद्ध पुकारण्यात आले असून, येत्या चार ते पाच दिवसांत सर्व बेकायदेशीर कत्तलखाने पूर्णपणे उध्वस्त करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत.
शहरात सध्या सुमारे २८ अवैध कत्तलखाने सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, यामुळे पसरणारी दुर्गंधी आणि प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून, ही कारवाई मोठ्या पोलीस बंदोबस्तात पार पडणार आहे.


आमदार खताळ यांनी स्पष्ट केले की, यापूर्वी केलेल्या कारवाया केवळ तात्पुरत्या ठरल्या होत्या, मात्र आता हे कत्तलखाने कायमस्वरूपी बंद केले जातील. वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींवर ‘एमपीडीए’ अंतर्गत कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
संगमनेर शहराच्याá स्वच्छतेला आणि आरोग्याला लागलेला हा कलंक पुसून काढण्यासाठी आपण कटिबद्ध असून, नागरिकांच्या आरोग्याशी किंवा कायदा-सुव्यवस्थेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
