संगमनेर –
संगमनेर तालुक्यातील ग्रामीण राजकारणात सध्या मोठी शांतता पसरली आहे. तालुक्यातील तब्बल ९७ ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून (९ फेब्रुवारीपासून) या सर्व ग्रामपंचायतींचा कारभार अधिकृतपणे प्रशासकीय यंत्रणेमार्फत हाताळला जात आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या कायदेशीर कचाट्यात सापडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अद्याप प्रलंबित असल्याने निवडणूक आयोग निवडणुका जाहीर करू शकलेला नाही. मुदत संपलेल्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना मुदतवाढ न मिळाल्याने अखेर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सरपंचांची ‘पॉवर’ आता संपुष्टात आली असून विकासकामांचे निर्णय घेण्याचे अधिकार प्रशासकांकडे वर्ग झाले आहेत.


प्रशासकीय नियुक्त्या झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये अकलापूर, आंबी दुमाला, आबी खालसा, औरंगपूर, भोजदरी, बोटा, चंदनापूरी, चणेगाव, चिखली, चिंचपूर बु., दाढ खुर्द, देवगाव, देवकौठे, डिग्रस, हिवरगाव पठार, हिवरगाव पावसा, जाखुरी, जवळेबाळेश्वर, जवळेकडलग, कऱ्हे, कनोली, कासारा दुमाला, कासारे, कौठे बु., कौठे धांदरफळ, कौठे कमळेश्वर, कोठे खुर्द, कोठे मलकापूर, खळी, खांबे, खंदरमाळवाडी, खांडगाव, राजापुर, खरशिंदे, कोकणगाव, कोंची मांची, कुरण, कुरकुंडी, कुरकुटवाडी, लोहारे, महालवाडी, मालदाड, माळेगाव हवेली, माळेगाव पठार, मंगळापूर, मनोली, मेंढवण, म्हसवंडी, मिरपुर, मिर्झापूर, नांदूर खंदरमाळ, निमगाव बु., निमगाव खुर्द, निमगाव टेंभी, ओझर बु., पळसखेडे, पानोडी, पारेगाव बु., पारेगाव खुर्द, पेमगिरी, पिंपळगाव देपा, पिंपळगाव माथा, पिंपळे, पिंप्री लौकी अजमपूर, पोखरी बाळेश्वर, प्रतापपुर, राजापूर, रायते, रायतेवाडी, समनापुर, संगमनेर खुर्द, सांगवी, सावरचोळ, सावरगाव घुले, सावरगाव तळ, शेडगाव, शिबलापूर, शिंदोडी, शिरसगावधुपे, शिरापूर, सोनेवाडी, सोनोशी, सुकेवाडी, तिगाव, वडगाव लांडगा, वडगाव पान, वनकटे, वरुडी पठार, वरवंडी, वेल्हाळे, झरेकाठी, झोळे, शेंडेवाडी, नान्न्ज दुमाला, सारोळे पठार आणि काकडवाडी या गावांचा समावेश आहे.
प्रशासक राज आल्याने सध्या ग्रामपंचायतींमधील राजकीय गाठीभेटी आणि बैठकांना पूर्णविराम मिळाला आहे. तरीही, अनेक इच्छुक उमेदवार आगामी निवडणुकांच्या आशेने ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. न्यायालयाचा निकाल कधी येतो आणि पुन्हा एकदा निवडणुकीचा बिगुल कधी वाजतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
