संगमनेर:
शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेने मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी ‘अभय योजना’ लागू केली असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत ३१ मार्च २०२६ पर्यंत संपूर्ण थकबाकी एकरकमी भरणाऱ्या नागरिकांना दंडाच्या रकमेत (शास्ती) ५० टक्के सवलत मिळणार आहे.

मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी स्पष्ट केले की, शासनाच्या निर्देशानुसार आता वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये नळ कनेक्शन तोडणे, मालमत्ता जप्त करणे आणि थकबाकीदारांची नावे सार्वजनिक ठिकाणी फलकांवर प्रसिद्ध करणे अशा पर्यायांचा अवलंब केला जाणार आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी सुट्टीच्या दिवशीही कर भरणा केंद्र सुरू ठेवण्यात आली आहेत. शहराच्या स्वच्छतेसाठी आणि नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी सर्व करधारकांनी वेळेत कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षांसह उपाध्यक्ष नूरमहम्मद शेख आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केले आहे.
