संगमनेर:
संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाचा तातडीने आढावा घेऊन ज्या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे, तिथे प्रशासनाने तात्काळ टँकर सुरू करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिना संपत आला असून मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाढत्या उष्णतेमुळे भूगर्भातील पाणीपातळी खालावली असून, अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही मागणी केली आहे.


तालुक्यातील कष्टकरी, शेतकरी आणि शेतमजूर यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, याची खबरदारी प्रशासनाने आतापासूनच घेणे आवश्यक आहे. वाढत्या उन्हामुळे पाणी टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने संगमनेर पंचायत समितीच्या टंचाई विभागात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन टंचाईग्रस्त गावांना दिलासा द्यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या संदर्भातील मागणीचे निवेदन संगमनेरचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष दिपक वर्पे, तालुकाध्यक्ष राहुल पानसरे, तालुका उपाध्यक्ष संजय शिंदे, बजरंग घुले, ऋषिकेश गिरी, तेजस पानसरे यांसह पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
