संगमनेर:
मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष वसुली मोहीम राबवण्यात येत असून, थकबाकी न भरणाऱ्या २२ मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्याची धडक कारवाई करण्यात आली आहे. स्वतः मुख्याधिकारी गोरे थकबाकीदारांच्या भेटी घेऊन त्यांना कर भरण्याचे आवाहन करत आहेत.
मार्चअखेर जवळ आल्याने संगमनेर नगर परिषदेने मालमत्ता आणि पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मोहिमेसाठी कर अधिकारी श्वेता शिंदे आणि कर निरीक्षक बाजीराव नवले यांच्यासह वसुली विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत.


ज्या थकबाकीदारांनी वारंवार सूचना देऊनही कर भरलेला नाही, त्यांच्यावर आता कोणतीही पूर्वसूचना न देता जप्तीची कारवाई केली जाणार आहे. यामध्ये दुकाने व गाळे सीलबंद करणे, निवासी मालमत्ता जप्त करणे आणि जप्त केलेल्या मालाचा जाहीर लिलाव करणे अशा कठोर पावलांचा समावेश असेल.
भविष्यात ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून, थकबाकीदारांनी कटू कारवाई टाळण्यासाठी आपला कर वेळेत भरावा आणि शहराच्या विकासात सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख, सर्व नगरसेवक आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले आहे.
