संगमनेर:
मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी शहरात ‘मराठी भाषा भवन’ उभारण्याची आग्रही मागणी केली आहे. मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरेल, असे सांगत त्यांनी यासाठी राज्य शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
आमदार खताळ यांनी आपल्या भाषणात संगमनेरच्या समृद्ध साहित्यिक वारशाचा उल्लेख केला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे हे संगमनेरचेच असल्याचे सांगत त्यांनी मतदारसंघाचा गौरव केला. संगमनेर हे शहर साहित्य, संस्कृती आणि सामाजिक चळवळींचे केंद्र राहिले असून, येथे मराठी भाषेवर संशोधन आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी स्वतंत्र भवनाची नितांत गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


हे भवन कार्यान्वित झाल्यास साहित्य संमेलने, व्याख्याने आणि परिसंवादांच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान जागृत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
