संगमनेर:
वयाच्या १९ व्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेणाऱ्या भाऊसाहेब थोरात यांनी आयुष्यभर शब्दांचा पक्केपणा आणि मनाचा सच्चेपणा जपत सामान्य माणसाच्या विकासासाठी स्वतःला समर्पित केले. ते समाजविकासासाठी आयुष्यभर झटणारे कृतिशील संत होते असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक मल्हार अरणकल्ले यांनी काढले.
अमृत उद्योग समूहाच्या वतीने स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या १६ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे अभिवादन सभा संपन्न झाली. यावेळी आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, ॲड. माधवराव कानवडे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अरणकल्ले यांनी म्हटले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकार, शेती, शिक्षण आणि दूध व्यवसायाच्या माध्यमातून थोरात यांनी समृद्ध तालुका घडवला. स्वतःच्या सरकारविरोधात जनसामान्यांसाठी मोर्चे काढणारे ते धाडसी नेते होते. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी राबवलेले दंडकारण्य अभियान ही एक मोठी लोकचळवळ ठरली असून, त्यांचा हा नैतिकतेचा आणि लोकसेवेचा वारसा आमदार बाळासाहेब थोरात समर्थपणे पुढे चालवत आहेत.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, भाऊसाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीमुळेच दुष्काळी संगमनेर तालुक्याचा विकास झाला. त्यांच्या कार्याचा पाया नैतिकता हाच होता, ज्यामुळे आज येथील सहकार मॉडेल देशाला दिशादर्शक ठरत आहे. राजहंस ब्रँडची निर्मिती आणि एसएमबीटी हॉस्पिटलच्या माध्यमातून सामान्यांच्या आरोग्याची घेतलेली काळजी ही त्यांच्या स्वप्नपूर्तीचे प्रतीक आहे.
कार्यक्रमाचे आभार पांडुरंग घुले यांनी मानले. तत्पूर्वी, पुण्यस्मरण दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित ‘भजन संध्या’ कार्यक्रमात विविध संतांच्या अभंगवाणीने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.
