संगमनेर:
अहिल्यानगर जिल्हा पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असून, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. श्रीरामपूर विभागातील १७ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तब्बल ३४ अट्टल गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचे (तडीपारीचे) प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्यात आले आहेत.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी गेल्या १० वर्षांतील गुन्हेगारांचा एक सविस्तर ‘क्राइम डेटाबेस’ तयार केला असून, त्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ माजली आहे.
या हद्दपारीच्या प्रस्तावामध्ये श्रीरामपूर शहर व तालुक्यातून योगेश सचिन गुंजाळ, भारत विष्णू धोत्रे, तंजील गफार खान, प्रशांत संजय थोरात आणि मनोज यशवंत पवार यांचा समावेश आहे. राहुरी विभागातून आरिफ गफुर शेख, अक्षय मच्छिंद्र कुसमुडे, करण भारत माळी व योगेश सोपान बाचकर यांच्यावर कारवाई प्रस्तावित आहे. कोपरगाव शहर व तालुक्यातून वैभव मुकेश कुन्हाडे, अनिकेत गणेश जाधव, योगेश सुरेश गायकवाड, बापू दत्तू शोधक आणि संदिप दादा काळे या गुन्हेगारांची नावे आहेत.
शिर्डी व राहाता परिसरातून संकेत आप्पासाहेब गव्हाणे, संतोष बाबुराव शिंदे उर्फ शफ्या, प्रशांत जनार्दन जाधव, प्रविण नानासाहेब वाघमारे आणि गोकुळ कारभारी मासाळ यांच्यावर प्रस्ताव दाखल झाले आहेत. संगमनेर शहर व तालुक्यातून शुभम बाळू गायकवाड, सद्दाम मन्सूर शेख, संदीप संजय वाल्हेकर उर्फ जब्या, अमोल संजय जोंधळे, सुयोग अशोक देवांगे, सत्यम भाऊसाहेब थोरात व आण्णासाहेब सूर्यभान वाडगे यांचा समावेश आहे. अकोले तालुक्यातून जनार्दन कमलाकर नवले, तर नेवासा तालुक्यातून धनंजय सुनील काशीद, यासीन गणी शेख आणि शुभम विश्वास उर्फ विश्वनाथ गर्जे याच्या टोळीतील आकाश उर्फ दत्तू सावंत, योगेश मच्छिंद्र सावंत व दिलीप दत्तात्रय शेलार यांच्यावर कारवाई प्रस्तावित आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या या डेटाबेसमध्ये गुन्हेगारांचे वय, गुन्ह्यांचे स्वरूप आणि त्यांच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीची सविस्तर नोंद ठेवण्यात आली आहे. यामुळे वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर अंकुश बसवणे सोपे झाले आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, अमोल भारती, कुणाल सोनवणे, निरज राजगुरू व विविध पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या पथकाने यशस्वी केली आहे.
समाजात दहशत निर्माण करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही आणि नवीन फौजदारी कायद्यानुसार कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
