संगमनेर:
संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील प्रसिद्ध हरीबाबा देवस्थानला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देऊन या परिसराचा कायापालट करण्याचा संकल्प आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे. वेल्हाळे येथील यात्रा उत्सवानिमित्त दर्शनासाठी आले असता त्यांनी भाविकांशी संवाद साधला. महायुती सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आपण पूर्णपणे प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
यापूर्वीच मंदिरासाठी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने या देवस्थानला तीर्थक्षेत्राचा अधिकृत दर्जा मिळवून दिल्याचे खताळ यांनी सांगितले. तालुक्यातील विविध मंदिरांच्या सोयी-सुविधांसाठी पर्यटन विभागाकडून दोन कोटींचा निधी आणल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. विकासकामांसाठी निधी आम्ही आणतोय, मात्र काही लोक विनाकारण राजकारण करून खोटे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली. वेल्हाळे परिसरातील पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून, आगामी काळात केवळ विकासकामांच्या जोरावर तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण सज्ज असल्याचे आमदार खताळ यांनी शेवटी स्पष्ट केले.
