Sat. May 30th, 2026

संगमनेर

तालुक्यातून जाणाऱ्या पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रायतेवाडी फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू आहे. या उड्डाणपुलाच्या कामामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी रायतेवाडी फाटा येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या समस्या समजून घेत, दर्जेदार व सुरक्षित काम करावे, अशा स्पष्ट सूचना आमदार खताळ यांनी दिल्या.

आमदार खताळ यांनी स्थानिक नागरिक व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत उड्डाणपुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नागरिकांनी उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात आपल्या विविध मागण्या मांडल्या. उड्डाणपुलाच्या ठिकाणी नागरिकांसाठी लहान भुयारी मार्ग (अंडरपास) असावा, उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना असलेले सेवा रस्ते (सर्व्हिस रोड) चांगल्या दर्जाचे व मजबूत करावेत, तसेच महामार्गावर वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी परावर्तक दिवे, रस्त्यावरील दिवे, उंच दिवे (हायमास्ट) व दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली.

तसेच उड्डाणपुलावरून वाहून येणाऱ्या पावसाच्या पाण्याची योग्य निचरा व्यवस्था करावी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निश्चित केलेल्या हक्काच्या मार्गाच्या (राईट ऑफ वे) पलीकडे येणाऱ्या चुकीच्या ठिकाणांचे अचूक मोजमाप करूनच काम करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन नागरिकांच्या वतीने आमदार खताळ यांना देण्यात आले.

या सर्व मागण्यांची दखल घेत आमदार खताळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेला व दैनंदिन जीवनाला कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊनच उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!